| Abstract: | आधुनिक भारतीय प्रशासनाच्या इतिहासात बडोदा संस्थानचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. ते एक दूरदृष्टी असलेले प्रशासक, समाजसुधारक आणि लोककल्याणकारी राज्याचे प्रारूप उभारणारे शासक म्हणून ओळखले जातात. सुशासन संकल्पनेतील पारदर्शकता, उत्तरदायित्व, सहभागात्मक प्रशासन, कार्यक्षमता व समावेशक विकास या तत्वांचा ऐतिहासिक पाया सयाजीराव महाराजांच्या प्रशासकीय सुधारणांमध्ये आढळतो. बडोदा संस्थानामध्ये त्यांनी केलेली प्रशासकीय पुनर्रचना, खातेनिहाय विभागणी, अधिकाऱ्यांची नेमणूक आणि विकेंद्रीकरण यामुळे प्रशासन अधिक कार्यक्षम झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देणे, ग्रामपंचायतींना अधिकार देणे आणि नागरिकांचा सहभाग वाढवणे यावर त्यांनी भर दिला. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कल्याणकारी धोरणांमध्ये शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण, ग्रंथालय चळवळ, उच्च शिक्षण, स्त्री शिक्षणाचा प्रसार आणि शिष्यवृत्ती योजना यांमुळे मानवी विकासाला चालना मिळाली. यासोबतच आरोग्य सेवा, स्वच्छता, पाणीपुरवठा, कृषी सुधारणा, उद्योग विकास आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य आधुनिक कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेशी सुसंगत होते. अस्पृश्यता निर्मूलन, सामाजिक समता आणि वंचित घटकांचे सक्षमीकरण यावर त्यांनी विशेष भर दिला. सयाजीराव महाराजांनी केवळ धोरणनिर्मिती केली नाही तर प्रभावी अंमलबजावणी, नियमित निरीक्षण, मूल्यमापन आणि प्रशासकीय उत्तरदायित्वाची मजबूत यंत्रणाही विकसित केली. |